क्रीडा

आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी खेळा!

क्रीडा क्षेत्र केवळ स्पर्धात्मक खेळातल्या प्रगतीसाठी नाही; तर एक संपूर्ण आरोग्यपूर्ण जीवनशैली विकसित करण्यासाठी.

सध्याच्या धकाधकीच्या युगात आपले राहणीमान निष्क्रिय झाले आहे. एकंदरच आयुष्याचा वेग वाढल्यामुळे आपण रोजच्या व्यवहारांसाठी चालत किंवा सायकलवर जाऊ शकलो तरी मोटारगाडी वर अवलंबून राहतो. खेळ, क्रीडा, शारीरिक कष्ट आणि हलन-चलन या नैसर्गिकरित्या केल्या जाणार्या गोष्टी आपल्याला रोजच्या जगण्यातून वेळ काढून आणि ठरवून करायला लागत आहेत. त्यामुळे खेळांसाठी लागणारे शरीर स्वास्थ्य आपल्याला केवळ तो खेळ खेळून मिळणार नसतं. संपूर्ण समाजाच्या स्वास्थ्यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीचा पुनर्विचार करावा लागणार आहे.

प्रश्नाचं स्वरूप


या प्रश्नाची सुरवात होते ती आपल्या अगदी लहानपणापासून. शाळेतील मुले सुद्धा दप्तराच्या ओझ्याखाली दबलेली असतात आणि त्यांना खेळायला पुरेसा वेळ मिळत नाही. महाराष्ट्रातल्या कित्येक शाळांना पटांगणं नाहीत आणि शाळांमध्ये खेळाचे दर्जेदार साहित्य अभावानेच उपलब्ध असते. प्रत्येक शाळेला कुशल क्रीडा प्रशिक्षक असायला हवेत आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ शिकवायला हवेत पण बर्याचदा मुलांना खेळाच्या तासाला फक्त 'पिटी' करायला लावतात. याचे एक कारण म्हणजे शालेय जीवनात अभ्यासापुढे खेळाला दुय्यम स्थान आपण दिले आहे. लहान मुलांमध्ये वाढता लट्ठपणा, मोठ्यामध्ये हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह ह्यासारखे चुकीच्या राहणीमानामुळे झालेले आजार ही आज आपल्या समाजासाठी खेदाची गोष्ट आहे. महाराष्ट्रात खेळाला उपजीविकेचं साधन करायला पोषक वातावरण नाही. वेगवेगळ्या खेळांसाठी स्वतंत्र अकादमी नाहीत. फक्त मोजकेच काही जण खेळाकडे गांभिर्याने बघतात आणि म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती मिळवलेले महाराष्ट्रातील अगदी कमी खेळाडू आहेत.

असं का होतं?


आपल्या शहरात सहज चालत किंवा सायकल वर रोजच्या कामांना जाता येईल अशी रस्त्यांची रचना नाही. आपल्या शहरांमध्ये बागा आणि उद्याने कमी झाली आहेत. खेळाची मैदाने जवळ जवळ नाहीतच. आपल्या शिक्षण व्यवस्थेत अभ्यासावर खूप जास्त भर आणि त्या मानाने खेळ आणि क्रीडा याला फारच कमी वेळ आणि महत्व आपण देत आहोत.

तांत्रिक प्रगतीमुळे आपल्या दैनंदिन व्यवहारातील बरीच कामे ही यंत्र करत असतो. उदाहरणार्थ कपडे धुवायला वॉशिंग मशीन वापरणे, चालण्याऐवजी वाहन वापरणे इत्यादी. कार्यालयीन काम सुद्धा तासंतास एका जागी बसून कॉम्पुटर वर केले जाते. याचाच परिणाम की आता आपले दिवसातले बरेच तास बैठे काम करण्यात जातात आणि म्हणूनच आपली जीवनशैली सुद्धा बैठी झाली आहे.

आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी पण बदलल्या आहेत. बाहेरचे, प्रक्रिया केलेले आणि डबाबंद खाद्यपदार्थ आपल्या आयुष्याचा भाग बनले आहेत.

भरपूर काम करून, पैसे कमवून लवकरात लवकर श्रीमंत होणे आणि अनेक सुख-सोयी विकत घेता येण्यावर आजच्या तरुण पिढीचा कल वाढलेला आहे. व्यायामाचा अभाव आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे मानसिक असंतुलन आणि नैराश्य सारखे आजार सुद्धा वाढले आहेत.

जागेच्या अभावी शाळांना पटांगणं नाहीत. खेळात प्राविण्य मिळवून खेळ हेच करियर म्हणून निवडणे आर्थिक दृष्ट्या सगळ्यांना शक्य होत नाही. महाराष्ट्रातल्या खेड्या-पाड्यातल्या इतरही गावातल्या मुलांमध्ये स्पर्धात्मक खेळासाठी लागणारी मानसिकता, धडाडी आणि शारीरिक क्षमता कमी पडते कारण कुपोषणामुळे पोटभर अन्न मिळत नाही, तिथे खेळाच्या स्पर्धेत मुलांनी प्राविण्य मिळवावे ही अपेक्षाच चुकीची आहे. प्रत्येक शाळेत खेळासाठी लागणारी साधनेही मिळतातच असं नाही.

शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे संतुलित असणे यालाच आरोग्यपूर्ण जीवन म्हणता येईल. आणि म्हणूनच मुद्दाम वेळ काढून आणि ठरवून शारीरिक व्यायाम, चालणे, धावणे, खेळणे, योगासनं, प्राणायाम, ध्यान आपल्याला करावे लागणार आहे.

काय करायला हवं?


  • शारीरिक व्यायाम रोजच्या राहणीमानात अंतर्भूत करून छोटे बदल घडवून आपले राहणीमान आरोग्यपूर्ण करायला हवे
  • दैनंदिन जीवनात प्राथमिक शाळेपासून मुलांची शारीरिक स्वास्थ्य चाचणी घ्यायला हवी
  • प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात क्रीडानिकेतन स्थापन करायला हवे
  • प्रत्येक जिल्ह्यात एक क्रीडा-अकादमी स्थापन करायला हवी
  • क्रीडा प्रशिक्षकांना प्रशिक्षण द्यायला हवे

महत्त्वाच्या कल्पना


  • रोजच्या व्यवहारांमध्ये व्यायामाचा अंतर्भाव होण्यासाठी शहराची तशी रचना
  • प्राथमिक शाळेपासून स्वास्थ्य चाचणी
  • राज्यात भरपूर क्रिडांगणे – ५००० क्रिडांगणांपासून सुरूवात
  • प्रत्येक जिल्ह्यात, शक्यतो तालुक्यात किमान १ क्रीडानिकेतन
  • प्रत्येक जिल्ह्यात विविध खेळ प्रकारासाठी क्रीडा अकादमी – महाराष्ट्रात किमान १०
  • क्रीडा प्रशिक्षक तयार करण्यासाठी महाविद्यालये

कार्यक्रम


रोजच्या व्यवहारांमध्ये व्यायामाचा अंतर्भाव

आरोग्यपूर्ण जीवनाची सुरुवात आपण राहतो त्या ठिकाणापासूनच होऊ शकते. बदल आपण आपल्या घरांपासून करू शकतो. सदनिका संस्कृतीमुळे घरांना बंदिस्तपणा आला आहे. घरं अशी हवीत की जिथे भरपूर सूर्यप्रकाश असेल. ती हवेशीर असतील. एका मजल्यावरील दोन घरांची रचना अशी असावी की जिथून शेजार्यांशी सहज संवाद साधता येईल. इमारतीतील तळमजल्यावर किंवा गच्चीवर चालायची सोय असावी. कुंपणाभोवती झाडे-फुले आणि दैनंदिन वापरायच्या वनस्पती, उदाहरणार्थ कढीपत्ता, गवतीचहा, तुळस, आपल्या घराच्या गच्चीत किंवा अंगणातच असावीत.

प्रत्येक गावात आणि शहरात घरापासून चालत जाता येईल अशा अंतरावर किमान एक मैदान बांधले जावे. या मैदानावर रोज संध्याकाळी जवळच्या परिसरात राहणारी किमान १०० मुले-मुली खेळू शकतील. त्यांना वयोगटानुसार विविध खेळ शिकवले जातील. खो-खो, कबड्डी, gymnastics मध्ये उंच उडी, लांब उडी सारखे शिकायला सोपे आणि कोणालाही खेळता येतील असे खेळ प्रशिक्षक शिकवतील. या मैदानाला आतल्या बाजूनी चालायची सोय असावी आणि आत बसायला बाक असावेत. सकाळ-संध्याकाळ या मैदानाचा वापर ज्येष्ठ नागरिक चालायला, इतर समवयस्क लोकांना भेटायला करू शकतील. एका बाजूला ६ वर्षाखालील लहान मुलांसाठी खेळणी असावीत.

याच मैदानात एका बाजूला एक व्यायाम शाळा (जिम) असेल जिथे व्यायामाचे आणि खेळाचे किमान साहित्य उपलब्ध करून देता येईल. इथे व्यायामाचे प्रशिक्षण, हास्य क्लब, योगासनाचे वर्ग चालवता येतील. संध्याकाळचा प्रसन्न वेळी व्यायाम करायला, चालायला, आपल्या परिसरातील लोकांना भेटायला, गप्पा मारायला एक हक्काचे ठिकाण हे मैदान उपलब्ध करून देईल.

घरातून चालत किंवा सायकलवर जाऊन दैनंदिन व्यवहार (बँक, दुकाने, शाळा, कार्यालय, बाजारपेठ) करता येतील अशी शहराची रचना असावी. चालत जाऊन नेहमीची कामे एका टप्प्यात करून परत चालत घरी जाता येईल अशी शहरातील प्रत्येक भागाची रचना असावी. प्रत्येक रस्त्याच्या एका बाजूनी स्वतंत्र सायकल मार्ग असावा.

रस्त्यावर पादचार्यांसाठी विशेष भाग राखीव असावा (कार-फ्री झोन). याच जागेत बाजारपेठ, दुकाने व बँक असतील. रविवारी किंवा सुट्टीच्या वारी या भागात जवळच्या गावातील ताजी भाजी व फळे शेतकरी विकायला आणू शकतील (Farmer's market).

शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य सुद्धा जपले जावे. सध्या खासगी वाहन चालवणार्यांना road rage आणि driving fatigue ने ग्रासले आहे. यामुळे मानसिक संतुलन बिघडते. सार्वजनिक वाहतूक जर सक्षम असेल तर खासगी वाहने रस्त्यावर अभावानेच येतील आणि मानसिक आरोग्य सुधारण्याच्या दिशेनी एक पाऊल उचलले जाईल. आपल्या शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असावी. बस आणि रेल्वे गाड्यांचे जाळे प्रभावी असून शाळा, महाविद्यालय, कार्यालये ज्या भागात आहेत, तिथे बसचे जाळे भरपूर असावे.

रोजच्या दैनंदिन कामांसाठी कमीतकमी खासगी वाहनांचा उपयोग आणि जास्तीत जास्त चालत, सायकलवर आणि सार्वजनिक वाहतूक वापरली जाईल अशी शहराची रचना आणि त्यानुसार वाहतूक व्यवस्था असावी. घराच्या अगदी जवळ बस थांबा असावा.

स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने प्रत्येक भागात खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतील. ह्या स्पर्धेत त्या भागात राहणारे सगळे नागरिक भाग घेतील. ह्या मध्ये क्रिकेट, फुटबॉल पासून खो खो, कबड्डी, धावणे, पोहणे, gymnastics सारख्या क्रीडाप्रकारांचा अंतर्भाव असेल. अशा स्पर्धा घेण्यामागचा उद्देश असा की लोक जास्तीत जास्त खेळ खेळतील जेणेकरून आपोआपच आरोग्यपूर्ण जीवन जगण्याकडे पाऊल उचलले जाईल.

प्रत्येक व्यक्तीने एक तरी खेळ खेळणे किंवा नियमित चालणे, धावणे हे या मागचे उद्दिष्ट राहील.

प्राथमिक शाळेपासून स्वास्थ्य चाचणी

प्रत्येक प्राथमिक शाळेला पटांगण असावे . निदान ५ मिनिटात चालत जाता येईल इतक्या लांबीवर त्या भागातील जवळचे मैदान किंवा पटांगण शाळेसाठी वापरता येईल. महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमधून दर वर्षी मुलांची स्वास्थ्य चाचणी घेण्यात यावी. ही चाचणी केंद्र सरकारच्या "Exposure Draft on National Physical Fitness Programme for School Children" मध्ये दिलेल्या प्राथमिक शाळेत शिकणार्याे मुलांच्या शारीरिक क्षमतेवर आधारित असेल. ज्या मुला-मुलींची क्षमता उत्तम असेल त्यांना ज्या खेळात गती असेल अश्या खेळासाठी तयार करण्यात येईल. या मुलांना प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर क्रीडानिकेतन मध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास प्रोत्साहन दिले जावे.

जी मुलं-मुली वयानुसार शारीरिकदृष्ट्या कमी पडतील त्यांची क्षमता वाढवण्यासाठी पोषक आहार, वैद्यकीय इलाज याच्यातून उपाय-योजना केल्या जाव्यात.

प्राथमिक शाळांमधून खो-खो, कबड्डी आणि Athletics सारखे शिकायला सोपे खेळ शिकवावे. सुरुवातीला या खेळाचे स्वरूप स्पर्धात्मक नसावे पण जशी ही मुलं ह्या खेळांमध्ये पारंगत होतील तसे त्यांना आधी आंतरशालेय, मग जिल्हा परिषद असे टप्प्या टप्प्या ने स्पर्धेत भाग घ्यायला उद्युक्त करावे.

कॅरम, बुद्धिबळ सारखे बैठे पण कसब पणाला लागणारे खेळ पण प्राथमिक शाळेपासून शिकवावे.

प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात क्रीडानिकेतन

प्रत्येक जिल्ह्यात किमान ४-५, शक्यतो प्रत्येक तालुक्यात १ क्रीडानिकेतनं स्थापन करण्यात यावे. ८वी पर्यंत प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले की काही कुशल मुला-मुलींना खेळातील प्रगती बघून क्रीडानिकेतन मध्ये प्रवेश दिला जावा. हे क्रीडानिकेतन निवासी स्वरूपाचे असेल. ४ वर्षांचा खेळाचा अभ्यासक्रम पूर्ण झाला की ही मुलं क्रीडा अकादमीत प्रवेश घेऊ शकतील. त्यांना खेळात करियर घडवायच्या दृष्टीने अनुकूल असे वातावरण दिले जावे. ही मुले जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करू शकतील.

प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा अकादमी

संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा पातळीवर किमान १० क्रीडा अकादमी स्थापन करण्यात याव्या. प्रत्येक अकादमी एका खेळासाठी सर्वोत्कृष्ट केंद्र (Centre for Excellence) असेल. इथे कुशल प्रशिक्षक कार्यरत असावेत. या अकादमीत राज्याभरातले प्रतिभावंत खेळाडू प्रशिक्षण घेतील. ज्यांना खेळात आपले करियर घडवायचे आहे त्यांना या अकादमीतून पोषक वातावरण मिळू शकेल. ज्या खेळासाठी ही अकादमी प्रसिद्ध असेल त्या खेळाचा प्रसार इतर जिल्ह्यात या अकादमीतून केला जाईल. जिल्हा पातळीवरच्या स्पर्धा या अकादमी तर्फे घेण्यात येतील.

क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, पोहणे यांची किमान एक सर्वोत्कृष्ट अकादमी असावीच. शिवाय कॅरम, बुदधीबळ, मल्लखांब, खो-खो, कबड्डी, स्केटिंग, athletics यांच्या सुद्धा सर्वोत्कृष्ट क्रीडा अकादमी स्थापन कराव्यात. या खेळांची आकादमीच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले खेळाडू पाठवेल.

प्रशिक्षित क्रीडा प्रशिक्षक

क्रीडा महाविद्यालयं स्थापन करण्यात यावीत. क्रीडा विषयातील संशोधन इथे होऊ शकते. स्पोर्ट्स-मेडिसिनची विशेष शाखा इथे कार्ययत असावी. सुसज्ज क्रीडा ग्रंथालय आणि क्रीडा संग्रहालय असावे.

या महाविद्यालयात क्रीडा प्रशिक्षकांसाठी विशेष अभ्यासक्रम असावा. प्रत्येक खेळासाठी एक स्वतंत्र विभाग असावा. सगळ्या खेळातील कुशल मार्गदर्शक येथे घडू शकतील. शालेय स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूंचे प्रशिक्षण देण्यात ह्या प्रशिक्षकांचे प्राविण्य असावे. क्रीडा संघ व्यवस्थापक, पंच, रेफ्री याचे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रासाठी मार्गदर्शन सुद्धा इथूनच मिळू शकेल अशी सोय असावी.

तळटीप


  • "The Right of Children to Free and Compulsory Education Bill 2008": Government of India: 2008
  • Government of India-Ministry of Youth Affairs and Sports-Department of Sports: "Exposure draft on National Physical Fitness Programme for School Children" : August 2012

Copyright © 2014 Maharashtra Navnirman Sena, Rajgad, Mumbai. All rights reserved.