मराठी ही जगात १५ वी सर्वात अधिक बोलली जाणारी भाषा आहे. मराठी भाषिक जगाच्या कानाकोपर्या त पोचलेले आहेत. तरीही तेवढ्या प्रमाणात आपली भाषा, आपली संस्कृती जगापुढे आली नाही. मराठी संस्कृती आणि इतर जग यांच्यामधला दुवा घट्ट करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे प्रयत्न करण्यासाठी शासनाची भूमिका प्रेरकाची आहे असं आम्ही मानतो. म्हणूनच, जगभरातल्या विविध देशांमध्ये वसलेल्या मराठी माणसांनी एकत्र यायला हवं. एकत्र येऊन, जगाच्या कानाकोपर्या त 'मराठीपण' जागं ठेवायला हवं! जगापुढे प्रभावीपणे ठेवायला हवं.
मराठी भाषा, मराठी माणूस आज जर मुख्य प्रवाहात दिसत नसेल तर जशी आसपासची परिस्थिती त्याला कारणीभूत आहे, तसेच, मराठी माणसाचं या संस्कृतीकडे झालेलं दुर्लक्ष, हे ही या परिस्थितीला तेवढचं कारणीभूत आहे. मराठी माणूस जगात कुठेही गेला तरी तो तिकडच्या चालीरीती, तिथली संस्कृती सहज आत्मसात करतो. आपला मराठीपणा टिकवला जावा म्हणून तो काही प्रमाणात प्रयत्न करतो देखील पण ते प्रयत्न एका छोट्या गटापुरते मर्यादित असतात. हे मराठीपण जगासमोर यावं म्हणून, एकत्र येऊन तो प्रयत्न करताना दिसत नाही.
जगाला आज जो काही थोड्या प्रमाणात महाराष्ट्र माहिती आहे, अभ्यास होतो आहे, तो आहे ऐतिहासिक महाराष्ट्र. जगभरात काही ठिकाणी महाराष्ट्रातली संत परंपरा, वांग्मय यावर अभ्यास होतो आहे. पण आजच्या महाराष्ट्राचं चित्र आपण जगासमोर आणू शकलो नाही. आपल्या इतिहासाची ओळख तर जगाला व्हायला हवीच; परंतु महाराष्ट्राचं आजचं चित्रही आपण जगाला दाखवू शकलो पाहिजे. जगभरात विविध देशात, मराठी माणूस मोठी कामगिरी करत असला तरी अजून एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी काही करण्यामध्ये मागे पडतो आहे.
जगाचा महाराष्ट्राशी व्यापार थेट व्यापार वाढायला हवा. देवाण घेवाण वाढायला हवी.
आज मराठी भाषेला जगामधल्या महत्त्वाच्या भाषांच्या यादीत, किंवा महाराष्ट्राला जगातल्या महत्त्वाच्या राज्यांच्या यादीत फार महत्त्वाचं स्थान नाही. महाराष्ट्रातले तरुण आज फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन, रशियन भाषा शिकतात. कारण या भाषा शिकल्यामुळे त्यांना शिक्षणाच्या, नोकरी - व्यवसायाच्या विविध संधी निर्माण होतात. त्यांना एका नव्या देशाची, भाषेची, संस्कृतीची ओळख होणं हे गरजेचं, हवंहवंस वाटतं. या भाषा शिकणार्यांरना एक प्रतिष्ठा आहे. दुर्दैवाने महाराष्ट्राबद्दल असं होत नाही. कारण, आज महाराष्ट्र कोणत्याच बाबतीत जगाला काही उदाहरण म्हणून, संधी म्हणून देऊ शकत नाही.
आपल्याकडे जे आहे ते आपण वाढवू शकत नाही. ते जगासमोर नीट मांडू शकत नाही. आपण विविध क्षेत्रात जगासमोर कसं उदाहरण घालून देऊ शकू याबद्दल आपण याच संकेतस्थळावर इतरत्र वाचू शकाल.
हे जरी असलं तरी मराठी माणसाकडे आपल्याला असलेलं ज्ञान, कौशल्य, केलेलं महत्त्वाचे विचार जगापुढे मांडण्यासाठी हवी आहे ती इच्छा शक्ती.
आज मराठी ही व्यापाराची, न्यायाची, करमणुकीची भाषा नाही. त्यामुळे मराठीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान नाही.
मराठी माणूस हा जगभरात अनेक ठिकाणी राहतो आहे. त्या त्या जागी तो आपल्या परीने मराठी जपण्याचा प्रयत्न देखील करताना दिसतो आहे. पण, हे प्रमाण फार थोडे आहे. मराठी मंडळे, महाराष्ट्र मंडळे यांनी मराठी भाषा, मराठी संस्कृती जपण्यासाठी, तिला अधिक समृद्ध करण्यासाठी हातभार लावायला हवा. जगातल्या जवळ-जवळ सर्व प्रमुख शहरे जसे, लंडन, टोकियो, मॉस्को, न्यूयॉर्क, रोम, पॅरिस, बर्लिन येथे मराठी संस्कृती आणि अभ्यास केंद्रे स्थापन व्हायला हवीत. इथल्या स्थानिक मराठी माणसांच्या मदतीने अशी केंद्रे उभारता येतील.
या केंद्रांमध्ये काय करता येईल-